रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला..!रत्नागिरीतील सड्यांवर रानफुलांचा रंगोत्सव..
हिरवी नाजुक रेशिम पाती, दोन बाजूनी सळसळती नीळ नीळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेच्या या ओळी वाचताना डोळ्यांसमोर जो निसर्गाचा विलोभनीय कॅनव्हास उभा राहतो, तोच कॅनव्हास सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमधील सड्यांवर प्रत्यक्षात अवतरला आहे. पावसाच्या अधून-मधून बरसाणाऱ्या सरी ओसरल्यावर, इथल्या तांबड्या मातीच्या सड्यांनी जणू हिरवा शालू नेसला आहे. त्यावर विलोभनीय रानफुलांची रंगीबेरंगी 'वेलबुट्टी' साकारली आहे. साताऱ्याचे 'कास पठार' आणि कोल्हापूरचे 'मसाई पठार' यांनी आजवर आपल्या रानफुलांच्या सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. पण, आता रत्नागिरी परिसरातील सडेही "आम्ही देखील पाठीमागे नाही, येवा आमचो सौंदर्य न्याहाळा!" अशी प्रेमळ साद पर्यटकांना घालत आहेत. साडवली, जैतापूर, देवाचे गोठणे, ना...