चंद्रामतात्या
"मुलगी पसंत हाय न्हवं.. तुमास्नी.." "व्हय तर.. हे काय इचारनं झालं व्हय.." "झालं तर मग.. आता जरा देण्या-घेण्याचं बोलू.." "देण्या-घेण्याचं आनी काय त्यात?" "तसं न्हवं.. रित-भात हायच की.. ती सोडून चालत्या व्हय.." "आरं ए मर्दानू.. का उगीच वात्या कुटाय लागलाय? पाव्हणं तुम्ही तुमचा मुलगा सजवा, आणि पाव्हणं तुम्ही तुमची मुलगी ! झालं न्हवं मनासारखं.. चला, आता घ्या साखर आनी करा एकमेकांचं त्वांड गोड" चंद्रामतात्यानं शेवटी अधिकारवाणीनं तोडगा काढला. गेले चार तास चाललेल्या चर्चेवर हुकमी तोड निघाली होती. वायफळ बडबडून हातघाईवर येणारं प्रकरण क्षणार्धात शांत झालं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलेलं दिसत होतं. फिसकटणारी बोलणीच नाही, तर दोन कुटुंबं, दोन मनं आणि नवी सोयरिक चंद्रामतात्याच्या मध्यम मार्गानं जोडली गेली होती. साखरपुडा संपन्न झाला. इकडं मुठी भरभरून साखर एकमेकांच्या तोंडात घालत, पाहुणे मंडळी खिदळत होती. तर तिकडं आतमध्ये आता बायकांची एकच धांदल उडाली होती. उपवधुला हळदी-कुंकू लावून तोंडात साखर घालणारे मघाचे हात, आता पदर खोचत स्वयं...