Posts

Showing posts from October, 2022

प्रवास..आठवणींचा..!

Image
      आकाशातील विमानाचा आवाज कानावर पडताच क्षणी वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशी घरा-घरातून पोरं-टोरं बाहेर पडायचीत! त्यात मी ही एक असायचो. मग, अगदी खेळण्यातले वाटावे इतक्या छोट्या आकारातील ते आकाशात चमकणारे विमान बालपणी कौतुकानं पहात स्तब्ध व्हायचो. पांढरीधोट रेषा आकाशात काढत ते पुढं सरकायचं. कधी-कधी ते ढगांच्या आड गायब व्हायचं आणि पुन्हा दिसायचं. डोळ्यांच्या भिंगांवर उन्हं घेत मानंची दुर्बीण थेट आकाशात झेपावलेली असायची. अगदी नजरेआड होईस्तोवर हा कौतुकाचा अन् उत्सुकतेचा खेळ गल्लीत रंगलेला असायचा.        रात्री अंगणात उताणा पडून आकाशातील विस्कटलेल्या चांदण्यातून दिव्याचा चमचमाट करीत पुढे जाणारे विमान पाहताना भारी मज्जा वाटायची. त्याचा लाल दिवा पेटायचा क्षणार्धात बंद व्हायचा..तो पुन्हा पेटायचा. अशी लाल दिव्याची उघड-झाप करीत तेही मग विस्कटलेल्या चांदण्यांच्या पसाऱ्यात कुठंतरी निघून जाई.         आकाशाच्या निळ्या-काळ्या पाटीवर दिवसा पांढऱ्या रेघोट्या काढत जाणाऱ्या विमानाला आम्ही 'राॕकेट' म्हणायचो...

..गवतानेच गवताचा भारा बांधूया

Image
        शनिवारची सकाळची अर्धी शाळा सुटल्यावर खाकी चड्डीवर करदोडा चढवून आणि पाठीवर दप्तर घेवून, दप्तर कसले ते, बाजारची पिशवीच ती! रविवारी आठवड्याच्या बाजारला कधी कधी वापरली जाई. डोक्याचा पैलवान कट आणि त्यावर चपचपीत लावलेले खोबरेल तेल, त्याचा ओघळ थेट गालावरुन कधी कधी गळ्यापर्यंत असायचा.  भर उन्हात पायात असली तर स्लिपर नाहीतर आनवाणीच धूळ उडवित चालायचो दप्तर सांभाळत चालता चालता फूफाट्यातला बाभळीचा काटा कच्चदिशी पायात मोडायचा आणि त्याची कळ मस्तकात शिरायची. मग फुफाट्यातच दगडावर बसायचो मोडलेला काटा काढायला... पायाला थुका लावून काटा काढायला त्याचा दुसरा भाऊबंदच लागायचा. नाजूक रक्त्ताच्या ठिपक्याबरोबर काट्याचा टोकदार मोडलेला तुकडा तळहातावर घ्यायचो. पापणीचा केस खस्सकन ओढून तोडायचो. तुटून हातात आलेला केस तळहातावरील काट्याला चिकटवून हळूहळू वर उचलायचो.. काटा उचलून वर यायचा..सगळंच कसं भारी वाटायचं..मस्तकात शिरलेली कळ विसरायला व्हायचं. तेव्हा पापणीच्या साध्या केसानंही काट्यासारखी वेदना हलकी व्हायची..अगदी राहिलीच तर दिव्यावर गुळ भाजून पायाला चटका द्यायचो...

महाराणांचे वंदनीय "प्रताप" धोरण

Image
जगात चीनच्या विशालकाय भिंतीनंतर दुसरा क्रमांक लागतो तो कुंभ्भलगड किल्ल्याच्या संरक्षण भिंतीचा. अशा विशालकाय किल्ल्यावर ९ मे १५४० रोजी युगपुरुष महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. मेवाडचे महाराणा उदयसिंह यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. १५७२ मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. १८ जून १५७६ मध्ये मुघल बादशहा अकबर च्या सैन्याबरोबर हल्दीघाटीत घनघोर युद्ध झाले.     हे युद्ध म्हणजे सांप्रदायिकतेचे युद्ध नव्हते. तर आत्मसन्मान, मातृमूमीची स्वतंत्रता व स्वाधिनतेचा संघर्ष होता. याचे प्रमाण म्हणजे  अकबरच्या सैन्याचा सेनापती जयपूरचे "कुँवर मानसिंग" होते. तेथेच महाराणा प्रताप यांच्या सैन्याचे सेनापती काबुलचे  "हाकीम खान सूर" होते.     ज्या बेहरम खानने अकबरला दिल्लीचा बादशहा बनविले, त्याच बेहरम खानचा मुलगा अब्दुल रहीम खान-ए-खाना हा बादशहाचा विश्वासू होता. तो अजमेरचा सुभेदार होता. खान-ए-खान शिवपूरमध्ये असल्याचे समजल्यावर महाराणा प्रताप यांचे पुत्र कुँवर अमरसिंह यांनी  मुघल सैन्यावर हल्ला चढविला. यात खान-ए-खानाच्या प्रांत, संपत्तीबरोबरच त्याचा जनानखानाही हा...

सात कापी चुणाची घावणे..

Image
      उसळ घावणे, घावणे चटणी, आंबोळी ही कोकणातील विशेष खाद्यसंस्कृती..! सातकापी चुणाचे घावण, शिरवाळे अन् घावण चटणी हे स्वादिष्ट केवळ उदरभरण नोहे मनतृप्तीचे पदार्थ नाश्त्यासाठी मिळाले. सातकापी घावणाविषयी रात्रीच चर्चा झाली होती आणि सकाळीच केळीच्या पानात पहुडलेले गरमा-गरम घावणे समोर आले.      एकाच चारकापी घावणात मी पुरता गारद झालो. 😀 जात्यावर दळलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या तांदळापासून बनवलेल्या पिठापासून ही घावणे बनवली जातात. ते ही चुलीवर तापलेल्या बिडाच्या तव्यावर शेकलेल्या-भाजलेल्या घावणांवर "चूण" म्हणजे खोबरं आणि गुळ एकत्र करुन केलेले मिश्रण-सारण त्यावर पसरवले जाते. अशी एकूण सात घावणे एकमेकांवर ठेवली की, ती झाली "सात कापी चुणाची घावणे.!"        थोडक्यात एकमेकावर रचून ठेवलेली चवडच म्हणा ना.. दोन कापी आणि दोन कापी अशा चार कापी घावणातच मनतृप्ती आणि उदर भरण संपुष्टात आल्याने पुढे केवळ एका घावणे-चटणीचा चव चाखण्याचा सोपस्कार पार पाडून जिभेवर रेंगाळणारा रुचकर गोडवा घेवून ओरोसला मार्गस्थ झालो. ❤️😊  ...