ज्या विहिरीत टँकर ओतला वेळूची ती विहीर जलयुक्तने झाली तुडुंब..!





ज्या विहिरीत टँकर ओतला वेळूची ती विहीर जलयुक्तने झाली तुडुंब..!


टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या कोरेगांव तालुक्यातील वेळू गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये टँकर ओतून या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात असे तीच विहीर आज गावात झालेल्या जयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांमुळे तुडुंब भरली आहे. वेळूच्या शिवारात जागोजागी पाणी खेळले आहे. सध्या सुरू असणा-या पाझर तलाव जोड प्रकल्पाने गाव निश्चितच टँकरमुक्त झालेले असेल.
अवघ्या 1511 लोकसंख्येचे वेळू हे गांव या गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत आणि श्रमदानातून मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून या गावात सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धाही घेण्यात आली. 445 कुटुंब संख्या असणा-या या गावात 311 शोषखड्डे तयार करण्यात आले. मनुष्यबळाव्दारे 924.31 घनमिटर सीसीटीचे काम तर 17 हजार 670 घनमिटर डीप सीसीटीचे काम यंत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 6 गॅबीएन बंधारे, 29 माती नालाबांध, कंपार्टमेंट बंडींग त्याचबरोबर खोलीकरण रुंदीकरण पाणीसाठा गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आणि शेततळी यांचा या कामामध्ये समावेश आहे.
गावातील सार्वजनिक विहिरीत टँकर ओतून त्यातून गावाला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या गावात झालेल्या या कामांमुळे काही दिवसांपूर्वी कोरडया असणा-या या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. गावची टंचाई कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी यांत्रिकी विभागामार्फत पाझर तलाव जोड प्रकल्प राबविण्यात येत आहे. 
प्रकाश भोसले (कार्यकारी अधिकारी यंत्रिकी विभाग)- गावामध्ये 4 पाझर तलाव आहेत यामधील बेलेवाडीमध्ये असणारा पाझर तलाव हा वरच्या बाजूला आहे आणि तो नेहमी पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहत असतो. उर्वरित तलावांमध्ये मोठया प्रमाणात गाळ आणि गळती होती. सध्या जलरोधी चर काढून या पाझर तलावांमधील गळती रोखण्यात आली आहे. त्याचबरोबर तलावातील गाळही मोठया प्रमाणात काढण्यात आला आहे. या कामांमुळे आणि झालेल्या पावसांमुळे सध्या या तलावांमध्ये समाधानकारक पाण्याची पातळी झाली आहे. बेलेवाडीतून ओसंडून वाहणारे अतिरिक्त पाणी खाली असणा-या पाझर तलावांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यासाठी 750 मिटर पाईपव्दारे हे दोन्ही पाझर तलाव जोडण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांत हा पाझर तलाव जोड प्रकल्प पूर्ण होईल.
प्रविण भोसले (सरपंच) - जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांच्या मार्गदर्शनाने गावामध्ये मोठया प्रमाणात लोकचळवळ उभी राहिली त्यातून जलसंधारणाची कामे करण्यात आली. ज्या विहिरी कोरडया होत्या त्या तुडुंब भरल्या आहेत. हे चित्र पाहून मोठे समाधान मिळत आहे. गावामध्ये ठिबक सिंचन मोठया प्रमाणात राबविण्यात येत आहे.
सुनील साळुंखे (तालुका कृषी अधिकारी)- कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या बंधा-यांमुळे चांगला पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. शेतक-यांची वॉटर बँक असणा-या शेततळयांची कामेही या गावात झालेली आहेत.
वैशाली सुतार (कृषी सहाय्यक)- कृषी विभागामार्फत खूप मोठया प्रमाणात कामं झाल्यामुळे 343 टीसीएम इतका पाणी साठा झाला आहे. यापुढे गावामध्ये टंचाई भासणार नाही.
संपत दिंडे (शेतकरी)- गावात चांगला पाणी साठा झाला आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. विहिरी तुडुंब भरल्या आहेत. निश्चितपणे शेतीचे उत्पन्न हे दुप्पट तिप्पट येईल.
पाझर तलाव जोड प्रकल्प हा भविष्यामध्ये वेळूला पूर्णपणे टँकरमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर लोकचळवळीने वेळूच्या शिवारात आणलेलं पाणी वेळूची नवीन ओळख बनली आहे.


                                                                                                             -प्रशांत सातपुते
                                                                                                             जिल्हा माहिती अधिकारी, सातारा



                                                                                                            

Comments

Popular posts from this blog

भैरवगडाच्या पायथ्याशी जिद्दीची पेरणी

स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मिती ; प्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी..भाग - ३ काठमांडूहून लुकलाकडे..